ऊसतोड कामगाराच्या मुलाने नीट परीक्षेत मिळवले ५२० गुण…
प्रतिनिधी / नांदेड
देगलूर तालुक्यातील दामला नाईक तांडा येथील एका ऊसतोड कामगाराच्या मुलाने नीट परीक्षेमध्ये ५२० गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.. प्रकाश राठोड असे या विध्यार्थ्याचे नाव आहे.. डोक्यावर विस्तीर्ण आकाशाचे छत आणि ऊसाच्या फडाजवळ मिळालेली मोकळी जागा अशा खडतर परिस्थितीतून अभ्यास करून प्रकाशने हे यश मिळवले आहे.. प्रकाशच्या रूपाने त्यांच्या दुर्लक्षित तांड्याला आता पाहिला डॉक्टर मिळणार आहे..
तेलंगना, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्याच्या सीमेवरील दामलानाईक तांडा हा साखर कारखान्याच्या गळीत हंगामात गावोगाव भटकंती करून आपला उदरनिर्वाह करत असतो.. या तांड्यातील श्रमिक कुटुंबात प्रकाश राठोड याचा जन्म झाला.. आई – वडिलांनी उदरनिर्वाहासाठी हातात कोयता घेतलेला आणि लहानपणापासूनच हलाखीची परिस्थिती असताना प्रकाशने वस्ती शाळेत चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले..
त्यानंतर त्याने जनापूर येथील चंगळामाता आश्रम शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले.. आणि नंतर कै. इंदिराबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले.. प्रकाशने शिक्षणाची गोडी लागल्याने जिद्दीने अभ्यास केला, आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.. त्यादृष्टीने त्याने तयारीही सुरु केली.. कोणतेही मार्गदर्शन नसताना, भौतिक सुविधा नसताना त्याने नीट परीक्षेची तयारी सुरु केली.. प्रकाश पहिल्या तीन प्रयत्नात अपयशी ठरला.. मात्र खचून न जाता त्याने चौथ्यांदा परीक्षेची तयारी सुरु केली आणि त्याला यशही मिळाले.. प्रकाश नीट परीक्षेत ५२० गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता.. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे..