शाळेच्या बसला अपघात, चालकासह विद्यार्थी गंभीर जखमी…
प्रतिनिधी / गडचिरोली
शाळेतील विध्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अहेरी आगारातील एका एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात चालक आणि विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज सकाळच्या सुमारास अहेरी – लगाम – मुलचेरा जाणारी एसटी बस लगाम परिसरातील शांतिग्राम, लगाम, कोलपल्ली, कोठारी, मल्लेरा येथून विध्यार्थ्यांना घेऊन जात असताना या बसला अपघात झाला आहे. मल्लेरा गाव ओलांडल्यानंतर चाची नाल्याजवळ एसटी बस रस्त्याच्या कडेला थेट जंगलात जाऊन झाडाला आदळली. त्यामुळे या अपघातात बसचालक आणि विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
सर्व जखमींना मुलचेरा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अहेरी उपविभागातील खराब रस्त्यामुळे शालेय विध्यार्थ्यांना आणि नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आणि येथील बसेसची अवस्थाही दयनीय आहे. त्यामुळे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एसटी बसचा प्रवासही आता धोकादायक असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.