चिठ्ठी लिहून महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये तरुणीने संपवले जीवन…
प्रतिनिधी / औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थीनीने आपल्या खोलीत आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोकशी दरम्यान पोलिसांना सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे सापडल्याने अभ्यासाच्या तणावातून या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे..
आरती सर्जेराव कोल्हे (वय -१९ ) रा. गुरुपिंप्री, ता, घनसावंगी जि. जालना असे या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.’ मी खूप साधी आहे, माझे बारावीपर्यंतचे शिक्षण खेडेगावात झाले आहे, मला शहरी वातावरणाची सवय नाही. शहराशी जुळवून घेताना माझी खूप कुचंबणा होते असे तिने चिठ्ठीत लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..
माझे स्वप्न टाटा बिर्लांसारखे मोठे होण्याचे आहे, माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत.. पण, मला बीकॉम तीन वर्षाचे असल्यामुळे मला ते झेपेल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे, असे देखील आरतीने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..